*"; श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी."*
(विशाल स्वामी @जिल्हा प्रतिनिधी)
अक्कलकोट : अधिक मासातील गुरुवार आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अढळ श्रद्धेमुळे आज अक्कलकोट नगरीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांतून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले.अधिक मास हा धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जात असल्याने स्वामी भक्तांनी दर्शन, पूजा-अर्चा, नामस्मरण आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून "अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय" या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
