*पुणे जिल्हा परिषदेच्या उच्चस्तरीय समितीकडून पाहणी*
प्रतिनिधी /संदीप लाड
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रानवली आणि गाणी ग्रामपंचायतींचे जिल्हास्तरीय मूल्यांकन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या उच्चस्तरीय सदस्य समितीने या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट देऊन विविध विकासकामांची आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल पाहणी केली.
या मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान समितीने ग्रामपंचायतींचे कार्यालयीन कामकाज, डिजिटल सेवा, कर वसुली, आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तपासली. तसेच गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शिक्षण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
मूल्यांकनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि समिती सदस्यांनी रानवली व गाणी ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून आणि शासकीय निधीचा योग्य वापर करून उभारलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. गावांचा हा पॅटर्न इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण मूल्यमापन प्रसंगी दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,अभिजीत माने विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या या दौऱ्यामुळे गावातील विकासकामांना अधिक गती मिळणार असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात या ग्रामपंचायती जिल्ह्यामध्ये उत्तम कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त होत आहे
