प्रतिनिधी /संदीप लाड
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे ग्रामपंचायतीने तालुका पातळीवर चतुर्थ क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक यशामुळे कारिवणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण तालुक्यात गावाचा डंका वाजला आहे. या यशाबद्दल पंचायत समिती श्रीवर्धनचे माजी सभापती श्री. बाबुराव चोरगे यांनी कारिवणे ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.कारिवणे गावाने विविध विकासकामे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सुप्रशासन या बळावर अभियानात हे यश संपादन केले. हे यश म्हणजे कारिवणे गावातील आदरणीय ग्रामस्थ, माता-भगिनी आणि तरुण मित्रांच्या एकजुटीची आणि विकासाच्या ध्यासाची पोचपावती आहे, अशा भावना श्री. बाबुराव चोरगे यांनी व्यक्त केल्या.गावाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेणारे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्तव्यदक्ष ग्रामसेवक आणि सर्व कर्मचारी वृंदांचे त्यांनी विशेष कौतुक केले. सर्वांच्या सामूहिक आणि एकनिष्ठ प्रयत्नांमुळेच कारिवणे गावाचा गौरव आज तालुका पातळीवर झाला असल्याचे त्यांनी सांगितले."आपल्या गावाचा हा विकासाचा रथ असाच अखंडपणे आणि वेगाने पुढे जात राहो हीच सदिच्छा! भविष्यातही गावाच्या प्रत्येक विकासकामात माझे सहकार्य आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असतील," असा विश्वास माजी सभापती श्री. बाबुराव चोरगे यांनी दिला असून कारिवणे ग्रामस्थांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे संपूर्ण कारिवणे परिसरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
