वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केंद्राचे बळ!पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मानले आभार
मुंबई - देशातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये 'बायोफार्मा शक्ती' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षांकरिता १०,००० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, यामुळे औषध निर्मिती क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे 'लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर'साठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्राने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.बायोफार्मा क्षेत्रातील जागतिक दर्जाचे 'इनोव्हेशन पार्क' निर्माण करण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे. या उपक्रमामुळे देशांतर्गत उत्पादन, निर्यात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
"महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे फार्मास्युटिकल आणि लॉजिस्टिक्स हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना केंद्र सरकारने पाठबळ दिले आहे. 'बायोफार्मा शक्ती' उपक्रम औषध क्षेत्रातील प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल", असा विश्वास अन्न व औषध प्रशासन, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला आहे.मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले आहेत.