प्रतिनिधी/ संदीप लाड
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'चा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी रानवली ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबवलेल्या विविध उपक्रमांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर, रानवलीने हे अभियान 'अत्यंत प्रभावीपणे' राबवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी मोरे, श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी राजू किरवे उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात आलेल्या प्रत्येक घटकाची आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. अभियानांतर्गत नियोजित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करून गावाला समृद्धीकडे नेण्यासाठी रानवलीने केलेले नियोजन पथदर्शी असल्याचे मत यावेळी नेहा भोसले यांनी व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान रानवलीचे सरपंच सुरेश मांडवकर, ग्रामविकास अधिकारी अभिजीत माने, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रानवली ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे
