*जिल्हा प्रशासनाचे स्वागत करत नारायणगव्हाण चौपरीकरणासाठी पाठपुरावा*
अहिल्यानगर : नगर–पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेले जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून जिल्हा प्रशासनाने महामार्गाच्या दुरुस्ती व सुरक्षिततेच्या कामांना गती दिली आहे.
महामार्गावरील वाढती वाहतूक, अरुंद रस्ता, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, साईडपट्टीची दुरवस्था, तुटलेले डिव्हायडर तसेच नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे प्रलंबित काम या विविध प्रश्नांबाबत त्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी व संबंधित विभागांनी महामार्ग दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते तसेच जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख संजय कुंभार यांचे स्वागत करण्यात आले. नारायणगव्हाण चौपदरीकरणाच्या उर्वरित कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी प्रांताधिकारी चिंचकर यांना दूरध्वनीद्वारे तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
भुमिअभिलेख विभागाच्या संपामुळे संबंधित अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी नारायणगव्हाण चौपदरीकरणासह नगर–पुणे महामार्ग पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके व शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नागरिकांनी आपल्या गावाजवळ सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांवर लक्ष ठेवून पारदर्शक व दर्जेदार काम होण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले.
