वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
के. आर. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे आज दिनांक १२ मार्च २०२६ रोजी कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते कर्मवीर बाबुराव ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. काळे यांनी कर्मवीर बाबुराव ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे हे नाशिक जिल्ह्यातील थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि वकील होते. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मोठे कार्य केले. तत्त्वनिष्ठ, करारी आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व असलेल्या ठाकरे यांनी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
तसेच यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि दूरदृष्टीचे राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जातात. १२ मार्च १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी शिक्षण, सामाजिक जाणीव आणि प्रभावी राजकीय नेतृत्वाच्या बळावर मोठे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सहकार चळवळ, औद्योगिक विकास, शेती आणि शिक्षण या क्षेत्रांना त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला भक्कम दिशा मिळाली. पुढे ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवरही कार्यरत होते. त्यांच्या शांत, संयमी आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे आजही त्यांच्या स्मृती जनमानसात जिवंत आहेत.
तसेच प्रा.एन.आर.पाटील , प्रा श्रीमती कापडणीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते.
