राज्यातील १५ जणांना 'पद्म'सन्मान
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्य पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह खात्याने रविवारी केली. आदिवासी लोककलेपासून पर्यावरण, कृषी नवोन्मेष, समाजसेवा, कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा आणि प्रबोधनापर्यत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबरोबर कोणताही गाजावाजा न करता पण प्रभावी योगदान देणाऱ्या मानकऱ्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या यादीत ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या यादीत १९ महिला, ६ विदेशी ( एनआरआय / पीआयओ / ओसीआय) व्यक्ती तसेच १६ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कार यादीत महाराष्ट्राने नेहमीप्रमाणे आपला ठसा उमटवला असून राज्याला १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ८४ जिल्ह्यांमधील मान्यवरांचा पद्मने सन्मान होणार आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्रातील परभणीसह विविध राज्यांतील १० जिल्ह्यांतील व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला. ३९,००० हून अधिक नामांकनांमधून सखोल, काटेकोर आणि वैज्ञानिक पद्धतीने बहुपातळी तपासणी व व्यापक सल्लामसलत करून एकूण १३१ पद्म पुरस्कारार्थी निवडण्यात आले. १२ वर्षात, १८ हून अधिक राजकीय पक्षांतील आणि २२ राज्यांतील नेत्यांना पद्म पुरस्कार देण्यात आले.
कला, लोकसंस्कृती व परंपरा : भिकल्या लाडक्या धिंडा : २० वर्षीय
आदिवासी कलाकार; दुधी भोपळा व बांबूपासून बनवलेल्या 'तारपा' या आदिवासी वाद्याचे जतन व प्रचार. रघुवीर तुकाराम खेडकर : तमाशा लोककलेच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती. माधवन रंगनाथन : सिनेसृष्टीत उल्लेखनीय कार्य
सतीश शहा : रंगभूमी आणि सिनेसृष्टीत उल्लेखनीय कार्य (मरणोत्तर)
कृषी व नवोन्मेष : श्रीरंग देवबा लाड : कापूस शेती तंत्र विकसित करून उत्पादन खर्च कमी व उत्पन्न वाढविण्यासाठी योगदान.
समाजसेवा, जनजागृती, वैद्यकीय सेवा आमिंडा फर्नाडिस (मुंबई) : आशियात पहिली 'मानवी दुग्धपेढी' स्थापन करून हजारो नवजात बालकांचे प्राण वाचवले.
सामाजिक कार्य: जनार्दन बापुराव बोथे : अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, 'जलसंधारण' आणि 'ग्रामविकास' क्षेत्रात आदर्श कार्य. विज्ञान आणि अभियांत्रिकी: जुझेर वासी : 'सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी. भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पाद्वारे शहरी पुनरुत्थानाचे एक आदर्श मॉडेल जगासमोर ठेवले.
क्रीडा : रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार असताना २ आयसीसी करंडक मिळवून दिले.
व्यापार आणि उद्योग : सत्यनारायण नुवाल : नागपूरस्थित 'सोलर ग्रुप'चे संस्थापक. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेली 'नागास्त्र'सारखी ड्रोन्स भारतीय लष्कराची ताकद वाढवत आहेत.
अशोक खाडे : 'दास ऑफशोअर' ही त्यांची कंपनी तेल आणि वायू क्षेत्रातील बड्या जागतिक कंपन्यांना अत्याधुनिक तांत्रिक सेवा पुरवते.
